विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; साईबाबा कॉर्नरवर उड्डाणपूल उभारण्याची ‘वृत्तवेध’ची मागणी
कोपरगाव वृत्तवेध :
साईबाबा कॉर्नर ते कोपरगाव रेल्वे स्थानक या महत्त्वाच्या मार्गाच्या विकासाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. केंद्रीय रस्ते निधीतून मिळालेल्या २० कोटी रुपयांच्या निधीतून साईबाबा कॉर्नर ते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यापर्यंत सिमेंट काँक्रेट चौपदरी रस्त्याचे काम करण्यात येणार आहे.
या कामाचे भूमिपूजन शनिवारी (दि. २९) उत्साहात झाले.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे मार्गदर्शक बिपीनदादा कोल्हे होते.

‘रस्ता दर्जेदार करा’; वाकचौरे यांचे आवाहन
मजबूत रस्ते ही परिसराच्या विकासाची महत्त्वाची पायाभूत सुविधा आहे. शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक आणि नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.
२० ते २५ वर्षे टिकणाऱ्या रस्त्याचे नियोजन
पूर्व भागातील अनेक गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. औद्योगिक वसाहतीतील २०० हून अधिक उद्योजक, संजीवनी विद्यापीठातील २० ते २५ हजार विद्यार्थी, तसेच साखर कारखाना, गोदावरी दूध संघ आणि रेल्वे स्थानकामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यामुळे पुढील २० ते २५ वर्षे टिकेल, अशा दर्जेदार सिमेंट काँक्रेट रस्त्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी साईबाबा कॉर्नर ते संजीवनी विद्यापीठ मार्गावर किमान दहा फुटांचा फुटपाथ, रस्ता पूर्ण झाल्यानंतर स्ट्रीट लाईट तसेच साईबाबा कॉर्नर येथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक सिग्नलची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रंबल स्ट्रिप्स आणि साईबाबा कॉर्नर येथे वाहतूक पोलिसांची नियमित उपस्थिती ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली.
दररोज ३० ते ४० हजार नागरिकांची ये-जा
साईबाबा कॉर्नर ते कोल्हे कारखाना हा मार्ग दररोज सुमारे ३० ते ४० हजार नागरिकांच्या वापरात असल्याचे बिपीनदादा कोल्हे यांनी सांगितले. त्यामुळे रस्त्याचे काम दीर्घकाळ टिकेल, अशा दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कामासाठी संजीवनी उद्योग समूह, औद्योगिक वसाहत आणि कोपरगाव नगरपालिका यांच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीकडे वाढणारी भाविकांची वाहतूक तसेच कोपरगाव रेल्वे स्थानकाच्या विकासामुळे या मार्गाचे महत्त्व आणखी वाढणार आहे. त्यामुळे २० कोटींच्या निधीतून होणारा हा आधुनिक रस्ता कोपरगावच्या पूर्व भागाच्या विकासाला गती देणारा ठरणार असून, विद्यार्थी, नागरिक, शेतकरी, उद्योजक आणि कारखान्यांच्या वाहतुकीला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. आभार वैभव आढाव यांनी मानले.
वृत्तवेध विशेष | साईबाबा कॉर्नरवर उड्डाणपूल कधी?
चौपदरीकरणाबरोबरच उड्डाणपुलाची गरज; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
साईबाबा कॉर्नर ते कोल्हे कारखाना या मार्गाचे चौपदरीकरण होत असताना साईबाबा कॉर्नर येथील वाढती रहदारी आणि अपघातांचा धोका लक्षात घेता येथे उड्डाणपूल उभारण्याची गरज प्रकर्षाने पुढे आली आहे. या ठिकाणी दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यातच कर्मवीर भाऊराव विद्यालयातील विद्यार्थी रस्ता ओलांडून ये-जा करीत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर आहे.
औद्योगिक वसाहत, संजीवनी विद्यापीठ, साखर कारखाना, रेल्वे स्थानक तसेच शहर आणि पूर्व भागाला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने आगामी काळात वाहतुकीचा ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ रस्त्याचे चौपदरीकरण करून प्रश्न सुटणार नाही. साईबाबा कॉर्नर येथे उड्डाणपूल किंवा वाहतूक सुरळीत करणारी कायमस्वरूपी सक्षम व्यवस्था उभारणे अत्यंत गरजेचे आहे.
हा परिसर अपघातप्रवण ठरत असल्याने प्रशासनाने रस्त्याचे काम सुरू असतानाच साईबाबा कॉर्नरचे स्वतंत्र वाहतूक सर्वेक्षण करावे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, वाढती वाहनसंख्या आणि भविष्यातील वाहतूक लक्षात घेऊन उड्डाणपुलाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करून त्याबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.
रस्ता विकासासोबत सुरक्षित वाहतूक व्यवस्थेचे नियोजन झाले, तरच या कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पाचा नागरिकांना अपेक्षित लाभ मिळेल.
चौकट | ‘स्वर्गीय शंकरराव कोल्हे मार्ग’ नाव देण्याची मागणी
साईबाबा कॉर्नर ते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यापर्यंत होणाऱ्या चौपदरी सिमेंट काँक्रेट रस्त्याला ‘स्वर्गीय शंकरराव कोल्हे मार्ग’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल यांनी कार्यक्रमादरम्यान केली.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
