‘आजची नोकरी उद्या असेलच असे नाही’
कोपरगाव वृत्तवेध:
तंत्रज्ञानाचा वेग इतका झपाट्याने बदलत आहे की, आज आपण ज्या नोकरीचे स्वप्न पाहतो तीच नोकरी दहा वर्षांनी अस्तित्वात असेलच असे नाही. त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानानुसार स्वतःला सतत अपडेट ठेवण्याची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही भविष्यातील प्रत्येक क्षेत्राचा भाग होणार असली, तरी विद्यार्थ्यांनी आपली विचारशक्ती एआयच्या हवाली करू नये, असा रोखठोक इशारा प्रसिद्ध लेखक व तंत्रज्ञान अभ्यासक अच्युत गोडबोले यांनी दिला.
शिर्डी येथील संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्याख्यानात गोडबोले मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. आर. एस. शेंडगे होते.
‘चॅट जीपीटी म्हणते म्हणून ते शंभर टक्के खरे मानू नका!’
एआयच्या वाढत्या वापराबाबत विद्यार्थ्यांना सावध करताना गोडबोले म्हणाले, ‘चॅट जीपीटीने एखाद्या प्रश्नाचे उत्तर दिले म्हणजे ते शंभर टक्के बरोबर असेल, असे समजू नका.’ एआय उपलब्ध डेटाच्या आधारे माहिती देते; मात्र ती प्रत्येक वेळी अचूक असेलच असे नाही. त्यामुळे एआयकडून मिळालेली माहिती पडताळून पाहण्याची सवय विद्यार्थ्यांनी लावून घ्यावी.
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर एआयकडून घेण्याची सवय लागल्यास तार्किक विचारशक्ती, सर्जनशीलता आणि निर्णयक्षमता कमकुवत होण्याचा धोका आहे. त्यामुळे एआयचा वापर माहिती मिळविण्यासाठी करा; मात्र स्वतःच्या मेंदूची जागा एआयला देऊ नका, असे त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्यापासून शेतीपर्यंत एआयचा प्रभाव
भविष्यात एआयमुळे नोकऱ्यांचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणातील आजारविषयक माहिती आणि पॅटर्नचे विश्लेषण करून निदानास मदत होऊ शकते. चीनमध्ये एआयआधारित आरोग्यसेवेचे प्रयोग सुरू आहेत. जपानमध्ये हॉटेलमधील विविध कामांसाठी रोबोटचा वापर होत आहे. अमेरिका, चीन आणि जपानमध्ये ड्रोन डिलिव्हरीचाही प्रत्यक्ष वापर सुरू झाला असून, भारतातही आगामी काळात त्याचा विस्तार होईल, असे गोडबोले यांनी सांगितले
एआयचा प्रभाव केवळ इंजिनिअरिंग किंवा तंत्रज्ञान क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नसून आरोग्य, शेती, शिक्षण, वाहतूक, कला यांसह जवळपास प्रत्येक क्षेत्रात त्याचा प्रभाव जाणवणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
‘फक्त इंजिनिअरिंगच्या मागे लागू नका’
विद्यार्थ्यांनी केवळ इंजिनिअरिंगच्या मागे न लागता स्वतःची आवड आणि क्षमता ओळखावी. ज्या क्षेत्रात रस आहे, त्या क्षेत्रात उत्कृष्टता मिळविण्याचा प्रयत्न करावा. भविष्यात यशस्वी होण्यासाठी केवळ पदवीपेक्षा बदलत्या काळानुसार शिकण्याची आणि स्वतःला विकसित करण्याची तयारी अधिक महत्त्वाची ठरणार असल्याचे गोडबोले यांनी सांगितले.
संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या शैला दुबे, संजीवनी अकॅडमीच्या प्राचार्या अनुश्रीता सिंग, डॉ. रितू वाजपेयी आदी उपस्थित होते.
वृत्तवेध फोकस
एआयचा स्वीकार करा; अंधानुकरण करू नका. तंत्रज्ञानाचा वापर वाढवा, पण विचार करण्याची ताकद स्वतःचीच ठेवा—अच्युत गोडबोलेंचा विद्यार्थ्यांना महत्त्वाचा संदेश.
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
