कोपरगाव | वृत्तवेध न्यूज
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शहर आणि ग्रामीण भागाला भेडसावणाऱ्या दीर्घकालीन वीज समस्यांच्या निराकरणासाठी महत्त्वाची प्रशासकीय हालचाल सुरू झाली आहे. विद्युतीकरण कामांच्या नूतनीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजूर करण्यात यावा, अशी मागणी आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याची माहिती पुढे आली आहे.
कोपरगाव तालुक्यात वाढती लोकसंख्या, झपाट्याने होत असलेले शहरीकरण आणि शेती क्षेत्राचा विस्तार यामुळे विद्यमान वीज वितरण यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. परिणामी वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाची वीज मिळणे आणि तांत्रिक बिघाडामुळे नागरिक, व्यापारी तसेच शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आ. कोल्हे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांचे नूतनीकरण, अधिक क्षमतेची नवीन रोहित्रे बसविणे, विद्यमान रोहित्रांचे क्षमतेनुसार उन्नतीकरण आणि शहरातील मुख्य वीजवाहिन्या भूमिगत करण्याची मागणी करण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे वीज वितरण अधिक सक्षम, सुरक्षित आणि भविष्यातील वाढत्या मागणीला पूरक होईल, असा दावा करण्यात आला आहे.
याशिवाय, या सर्व कामांसाठी नवीन डीपीआर तयार करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्यासमवेत मुंबई येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणीही आ. कोल्हे यांनी केली आहे.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास अनेक वर्षांपासून रखडलेल्या विद्युतीकरण प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याचा थेट लाभ घरगुती ग्राहक, व्यापारी, उद्योग क्षेत्र आणि शेतकरी वर्गाला होऊन अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आपले मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी बातमी शेअर करा.अशाच ताज्या स्थानिक बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
