कोपरगाव | वृत्तवेध न्यूज
कोपरगावात उभारण्यात येणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या नावाबाबत कोणतीही तडजोड होणार नाही, असा ठाम संदेश आमदार आशुतोष काळे यांनी दिला आहे.
नाट्यगृहासाठी प्रस्तावित जागेची कायदेशीर प्रक्रिया प्रलंबित असल्याने आवश्यक असल्यास जागा बदलली जाऊ शकते, मात्र नाट्यगृहाचे नाव ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ हेच राहिले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी कोपरगाव नगरपालिकेच्या प्रशासनाला दिले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे लोकार्पण, नाट्यगृह आणि समाजमंदिराच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी गुरुवारी आ. काळे यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद साधला. समाजबांधवांच्या भावना जाणून घेत त्यांनी त्यांच्या प्रमुख मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका मांडली.
स्मारकाच्या लोकार्पणाबाबत बोलताना आ. काळे म्हणाले, लोकार्पण सोहळ्याचा निर्णय समाजानेच घ्यावा. कार्यक्रमाची तारीख, स्वरूप आणि नियोजन समाजबांधवांनी एकमताने निश्चित करून नगरपालिकेला कळवावे. त्यानुसारच प्रशासनाकडून लोकार्पणाची अंमलबजावणी करण्यात येईल.
अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने भव्य नाट्यगृह उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, प्रस्तावित जागेच्या कराराची प्रक्रिया सध्या शासन स्तरावर प्रलंबित आहे. ती पूर्ण होताच कामाला वेग दिला जाईल. या प्रकल्पासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मुख्याधिकारी अजित निकत यांना उद्देशून आ. काळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “नाट्यगृहासाठी पर्यायी जागा शोधावी लागली तरी हरकत नाही; मात्र अण्णाभाऊ साठे यांच्या नावात कोणताही बदल होणार नाही. हे नाव कायम ठेवणे हीच प्रशासनाची जबाबदारी आहे.”
समाजमंदिरासाठी समाजबांधवांनी सुचविलेल्या जागेचीही माहिती घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आपल्या परिसरातील बातमी असेल तर ही पोस्ट आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये शेअर करा.अशाच ताज्या स्थानिक बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
