कोपरगाव वृत्तवेध:
‘निवडणूक झाली की राजकीय जोडे बाजूला ठेवा आणि गावहितासाठी सर्वांनी एकत्र या. गावाच्या विकासाचा कोणताही प्रश्न असेल, तो सोडविण्यासाठी आमदार या नात्याने पहिले पाऊल आम्ही उचलू,’ असा रोखठोक राजकीय संदेश आमदार विवेक कोल्हे यांनी धामोरीतून दिला.
निवडणुकीच्या राजकारणापेक्षा गाव आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या नवनिर्मित व्यावसायिक गाळ्यांचे उद्घाटन प.पू. रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते १० ऑगस्ट रोजी झाले. यावेळी आमदार विवेक कोल्हे बोलत होते.
४० उद्योजकांना व्यवसायाची संधी
बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असताना श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टने उभारलेल्या नव्या व्यावसायिक गाळ्यांमुळे सुमारे ४० उद्योजकांना व्यवसायाची संधी उपलब्ध होणार आहे. ट्रस्टची स्थापना १९५४ मध्ये झाली असून, आजवर ट्रस्टच्या कारभारावर कोणतेही शिंतोडे उडालेले नाहीत. सातत्याने विकासकामे करून ट्रस्टने तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे, असे कोल्हे यांनी सांगितले.
ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत ३१ व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून, आता आणखी १० गाळे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक छोटे व्यापारी आणि नवउद्योजकांना व्यवसाय सुरू करण्याची नवी संधी मिळाली आहे. ट्रस्टकडे सुमारे सात एकर जागा शिल्लक असून, भविष्यातही विकासाला मोठा वाव असल्याचे त्यांनी नमूद केले.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा
मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे धामोरी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत मिळावी, यासाठी मंत्रिमहोदयांकडे विनंती करण्यात आली असून, त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार कोल्हे यांनी सांगितले.
शासनाच्या योजना कागदावर न राहता त्या युवक, शेतकरी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी राज्यकर्ते आणि कार्यकर्ते म्हणून आपली आहे. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योग-व्यवसायासाठी विविध योजना उपलब्ध असून, उद्योजकांनी त्यांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
उपबाजारावर राजकारण झाले; आता शेतकऱ्यांना न्याय देणार!
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजाराचा मुद्दाही आमदार कोल्हे यांनी यावेळी उपस्थित केला. उपबाजार जाहीर झाल्यानंतर त्यावर काही प्रमाणात राजकारण झाले. तांत्रिक अडचणीही आल्या. मात्र, अखेर तालुक्यातील सर्व नेत्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले. त्यामुळे उपबाजाराचे महत्त्व सर्वांनाच माहीत असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपबाजाराच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीमालाला योग्य भाव मिळावा, तसेच मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे भरती प्रक्रियेवर बंदी असल्याने बाजार समितीला अधिकृत भरती करण्याची परवानगी मिळावी, यासाठी मंत्रिमहोदयांकडे विनंती करण्यात आली आहे.
‘येत्या काही महिन्यांत कोपरगाव येथील उपबाजार सुरू करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले जाईल,’ असे ठाम आश्वासन आमदार विवेक कोल्हे यांनी दिले.
विधानपरिषद आमदारपदी निवडीबद्दल सत्कार
विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल धामोरी ग्रामस्थांच्या वतीने विवेकभैय्या कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्यांनी धामोरीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विलासराव भाकरे, उपाध्यक्ष दत्तात्रय पवार, सचिव शिवाजीराव वाघ, विश्वस्त संपतराव भाकरे, विलासराव जगझाप, राहुल वाणी यांच्यासह प्रवीण जगन्नाथ शिंदे, कैलासराव माळी, अशोकराव भाकरे, बाजीराव मांजरे, विलासराव माळी, ज्ञानदेव मांजरे, नारायणराव मांजरे, मनोज जगझाप, सुनीलराव मांजरे, मनेषराव गाडे, विजयराव जाधव, अण्णा साळुंखे, भाऊसो भाकरे, सोपानराव कासार, विजुभाऊ गाडे, जयराम गडाख, रामराव जगताप, संजय बोडके, राजेंद्र कासार, लव्हाटे सर, भाऊसाहेब जाधव, बाळासाहेब अहिरे, डॉ. शिंदे, कैलासराव बारे, काकासाहेब वाघ, अविनाश अहिरे, विजयराव साळुंखे, नाजीमभाई शेख, प्रभाकर पारखे, लहू पवार, शंकरराव चव्हाण, श्रीरामराजे भोसले, नारायणराव भाकरे यांच्यासह ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
