कोपरगाव वृत्तवेध:
शहराच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी नागरिक, व्यापारी, उद्योजक आणि तज्ज्ञांनी एकत्र येत कोपरगावच्या मूलभूत प्रश्नांवर मंथन केले. ‘व्हिजन कोपरगाव’ मंचाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘संवादातून सुविधेकडे’ या विशेष संवाद कार्यक्रमात पार्किंग, वाहतूक कोंडी, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, मोकाट जनावरे, बाजारपेठ आणि उद्योग-व्यवसायांच्या विकासासह विविध प्रश्नांवर ठोस सूचना मांडण्यात आल्या.
कृष्णाई बँक्वेट हॉल येथे रविवारी (१६ ऑगस्ट) झालेल्या या कार्यक्रमाला शहरातील सुशिक्षित नागरिक, उद्योजक, डॉक्टर, वकील, अभियंते आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
बाजारपेठेच्या प्रश्नांवर सखोल चर्चा
पहिल्या सत्रात कोपरगावच्या बाजारपेठेच्या सद्यस्थितीवर चर्चा झाली. अशोक कोठारी, संजय बंब, संजय भन्साळी, सुधीर डागा, नितीन भुसारे आणि दीपक विसपुते यांनी बाजारपेठ विकासाबाबत विचार मांडले.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पार्किंगचे नियोजन, मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण, खड्डेमुक्त रस्ते, रस्ते बांधकामात योग्य तांत्रिक पद्धतीचा वापर, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, नवीन उद्योगांना चालना, युवा व्यापाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे आणि पर्यटन सुविधांचा विकास या मुद्द्यांवर चर्चा झाली.
पाणी, ड्रेनेज आणि स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर
दुसऱ्या सत्रात पायाभूत सुविधांवर चर्चा करण्यात आली. डॉ. डी. एस. मुळे, राजेश ठोळे, डॉ. राजेंद्र श्रीमाळी, प्रसाद नाईक, संतोष भट्टड, प्रा. रियाज शेख आणि प्रा. वृंदा कोऱ्हाळकर यांनी शहराच्या मूलभूत सुविधांबाबत सूचना केल्या.

नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, ड्रेनेज लाईनची दुरुस्ती, स्वच्छता व्यवस्था सक्षम करणे आणि स्थानिक उद्योजकांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
‘प्रश्न कागदावर न राहता ठोस उपाय हवेत’
आमदार विवेक कोल्हे म्हणाले, “कोपरगाव शहराला सुसज्ज आणि आधुनिक बनवण्यासाठी प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे आहे. नागरिकांनी मांडलेले प्रश्न केवळ कागदावर न राहता त्यावर टप्प्याटप्प्याने ठोस उपाययोजना केल्या जातील.” चार महिन्यांनंतर डिसेंबरमध्ये पुन्हा अशाच स्वरूपाचा संवाद कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नगराध्यक्ष पराग संधान यांनी नगरपरिषदेच्या वतीने शहरातील प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. भूमिगत गटारीचे काम सुरू असल्याने काही रस्त्यांच्या कामांना विलंब होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोकाट जनावरांसाठी नगरपरिषद गोशाळा उभारत असून हा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल, असे त्यांनी सांगितले.
नागरिकांच्या सूचना आणि लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांमुळे ‘संवादातून सुविधेकडे’ हा उपक्रम केवळ चर्चा न राहता कोपरगावच्या विकासाचा कृतीआराखडा ठरणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
