कोपरगाव | वृत्तवेध :
मोकाट जनावरांचा प्रश्न आता केवळ नागरिकांच्या जीविताचा राहिलेला नसून, त्याने कोपरगावच्या राजकारणालाच चांगलीच उष्णता दिली आहे. मोकाट जनावरांमुळे झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींसोबतच निविदा, कथित गैरबिले, ‘ॲडजस्टमेंट’, घरपट्टी आंदोलन आणि कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या हिशेबावरूनही राजकीय संघर्ष पेटला आहे.
‘दोनदा निविदा काढल्या, ठेकेदार आलेच नाहीत’
प्रशांत कडू यांनी मोकाट जनावरांचा प्रश्न अनेक वर्षांपासून शहराला भेडसावत असल्याचे सांगत विरोधकांवर या प्रश्नाचे राजकारण केल्याचा आरोप केला. मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी दोन वेळा निविदा काढण्यात आल्या; मात्र एकाही ठेकेदाराने निविदा भरली नाही, असा दावा त्यांनी केला. ठेकेदारांशी चर्चा केली असता पूर्वी काही लोकांना ‘ॲडजस्ट’ करावे लागत असल्याचे समोर आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
आता नव्याने निविदा काढून जिओ-टॅगिंगच्या माध्यमातून मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला जाईल. रस्त्यावर जनावरे सोडणाऱ्या मालकांवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा कडू यांनी दिला. “या अपघातांमध्ये आमच्या जवळच्या मित्रांना आम्ही गमावले आहे,” असे सांगत त्यांनी हा प्रश्न केवळ कोपरगावचा नसून देशव्यापी असल्याचे नमूद केले.
मालकांवरही कारवाईचा इशारा
वैभव आढाव यांनीही जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्या मालकांवर कारवाईची भूमिका स्पष्ट केली. जनावरे पकडल्यानंतर ‘हे आमचे जनावर आहे’ म्हणून फोन करणाऱ्यांवर आता थेट कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी रस्त्यावर जनावरांसाठी चारा टाकू नये, असे आवाहनही करण्यात आले.
गेल्या १०० दिवसांतील कामांचा लेखाजोखा मांडताना नालेसफाई, नाले खोलीकरण, अतिक्रमणे हटविणे, ओपन स्पेसची स्वच्छता, रस्ते धूळमुक्त करण्याचे प्रयत्न आणि प्लास्टिकविरोधी कारवाईचा उल्लेख करण्यात आला. प्लास्टिकविरोधात चार हजार स्टिकर्स लावण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
तीन दिवसांत ७१ जनावरे पकडल्याचा दावा
गेल्या तीन दिवसांत ७१ मोकाट जनावरे पकडल्याची माहिती दिली. शहरात सुमारे ४०० ते ४५० मोकाट जनावरे असल्याचा अंदाज असून, दिवस-रात्र कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.९ जून २०२५ रोजी मोकाट जनावरांच्या प्रश्नावर महिला भगिनींनी आंदोलन केले होते, याची आठवण करून देत त्यावेळी सत्तेत असलेल्या काळे यांच्या नेतृत्वाने योग्य कारवाई केली असती तर दोन मित्रांचे जीव वाचले असते, असा आरोप दडीयाल यांनी केला.
‘चार हजार कोटींचा हिशेब द्या’; संधानांचा थेट सवाल
नगराध्यक्ष पराग संधान यांनी विरोधकांच्या आंदोलनावर जोरदार पलटवार केला. मोकाट जनावरांच्या प्रश्नासोबतच शहरातील विकासकामांचा हिशेबही जनतेसमोर मांडण्याचे आव्हान त्यांनी दिले.
धारणगाव रोडवरील अपघात, कोळपेवाडीतील घटना आणि मोकाट जनावरांमुळे नागरिकांचे झालेले मृत्यू यांचा संदर्भ देत संधान यांनी आंदोलनाच्या उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“चार हजार कोटींचा हिशेब अद्याप कोणीही दिलेला नाही,” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
घरपट्टी आंदोलनावरही त्यांनी टीका केली. आंदोलनानंतर सुमारे ७०० हरकती आल्या असून, त्यातील ४०० हरकती कोऱ्या असल्याचा दावा त्यांनी केला.
‘तीन कोटींची बिले बाजूला ठेवली’
‘ॲडजस्टमेंट’च्या आरोपांवरून संधान यांनीही विरोधकांवर निशाणा साधला. आपल्या काळात अशी कामे होत नसल्याचा दावा करत सुमारे तीन कोटी रुपयांची काही बिले बाजूला ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या बिलांमध्ये काही पदाधिकारी आणि त्यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित कामांचा समावेश असल्याचा आरोपही त्यांनी केला.“आमचे भांडण सोडा, तुमचे भांडण बघा. तुमच्या सर्व कामांचा गौप्यस्फोट करणार आहे,” असा इशाराही संधान यांनी दिला.
फ्लेक्सपेक्षा मृतांच्या कुटुंबांना मदत करा
मोकाट जनावरांच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर संधान यांनी आणखी एक टोला लगावला. अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नावाने फ्लेक्स लावण्यापेक्षा त्यांच्या कुटुंबीयांना मदत केली असती तर अधिक समाधान झाले असते, असे त्यांनी म्हटले.
२५ ऑगस्टला आण्णाभाऊ साठे पुतळ्याचे लोकार्पण
दरम्यान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण २५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता गिरीश महाजन व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती देण्यात आली. विनोद राक्षे यांनी या पुतळ्यासाठी अनेक आंदोलने झाल्यानंतर आता लोकार्पण होत असल्याचे सांगितले. हा जगातील पहिला पूर्णाकृती पुतळा असल्याचा दावाही त्यांनी केला.
अनिल आव्हाड यांनी मुख्याधिकाऱ्यांवर दबाव का आणला जात आहे, असा सवाल उपस्थित करत कथित गैरबिले काढून घेण्यासाठी हा दबाव आणला जात असल्याचा आरोप केला.
जनावरांचा बंदोबस्त होणार की राजकीय आरोपांचीच धूळ उडणार?
कोपरगावात मोकाट जनावरांचा प्रश्न आता ‘रस्त्यावरील धोका’ ते ‘राजकीय संघर्ष’ असा प्रवास करताना दिसत आहे. सत्ताधाऱ्यांकडून कठोर कारवाईचे आश्वासन दिले जात असले, तरी प्रत्यक्षात मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त किती प्रभावीपणे होतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.आरोप-प्रत्यारोप, निविदा आणि कथित गैरव्यवहारांच्या राजकारणापलीकडे कोपरगावकरांना सुरक्षित रस्ते आणि अपघातमुक्त शहर कधी मिळणार? हा मात्र नागरिकांचा थेट सवाल आहे.
