कोपरगाव | वृत्तवेध :
पीकविमा, पाटपाणी, हमीभाव, सिंचन आणि वाढता उत्पादन खर्च अशा प्रश्नांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज थेट शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपने कोपरगाव तालुक्यात शेतकरी संवादाचा मार्ग स्वीकारला आहे. कोपरगाव मंडलातील टाकळी येथे भाजपचे प्रदेश महामंत्री तथा आमदार सुनील राणे यांनी आमदार विवेक कोल्हे यांच्या समवेत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या.
या संवादात पीक कर्ज, पीकविमा, हमीभाव, पाटपाणी, सिंचन, पाणी व्यवस्थापन, शेतीमालाची बाजारपेठ आणि शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळतो की नाही, याबाबत शेतकऱ्यांनी प्रश्न आणि सूचना मांडल्या. प्रदेश महामंत्री थेट शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आल्याने उपस्थित शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
‘प्रश्न ऐकणे पुरेसे नाही; मुळापर्यंत जाणे गरजेचे’
सुनील राणे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना शेतीसमोरील प्रश्न केवळ ऐकून घेणे पुरेसे नसून, त्या प्रश्नांच्या मुळाशी जाणे आवश्यक असल्याचे सांगितले. शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो का, याची माहिती घेणे गरजेचे आहे. पीकविमा, शेतीमालाला योग्य बाजारभाव, सिंचन व्यवस्था आणि उत्पादन खर्चाबाबत शेतकऱ्यांच्या सूचना जाणून घेऊन संबंधित प्रश्न शासनाच्या पातळीवर मांडण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
पाटपाण्याचे प्रभावी नियोजन करा : कोल्हे
आमदार विवेक कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यातील पाटपाण्याच्या प्रश्नावर लक्ष वेधले. उपलब्ध पाण्याचे प्रभावी नियोजन करून शेतकऱ्यांना नियमित आणि पुरेसे पाणी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना शेतीमालाला त्याप्रमाणात दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर मोठा परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पीकविमा योजनेत बदलाची गरज
शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पीकविम्याचा हप्ता भरतो. मात्र प्रत्यक्ष नुकसान झाल्यानंतर जाचक अटी आणि किचकट प्रक्रियेमुळे भरपाई मिळण्यात अडथळे येतात, असा मुद्दा आ. कोल्हे यांनी मांडला. त्यामुळे पीकविमा योजना अधिक पारदर्शक, सुलभ आणि शेतकरीपूरक करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
समृद्धी महामार्ग, विमानतळ, रेल्वेचा शेतीला फायदा घ्या!
कोपरगावला समृद्धी महामार्ग, विमानतळ आणि रेल्वे मालवाहतुकीच्या सुविधा जवळ उपलब्ध आहेत. या भौगोलिक सुविधांचा शेतीच्या विकासासाठी प्रभावी वापर करता येऊ शकतो, असे आ. कोल्हे यांनी सांगितले. तालुक्यात आधुनिक शीतगृहे, स्टोरेज आणि साठवणूक केंद्रे उभारल्यास शेतकऱ्यांना शेतीमाल साठवून योग्य वेळी योग्य दरात विकता येईल. त्यामुळे नासाडी कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांनी मांडल्या अडचणी, सूचना
यावेळी शेतकऱ्यांनी विविध प्रश्न आणि सूचना मांडल्या. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, अशोक पवार, सरपंच संदीप देवकर, शरदनाना थोरात, माजी सभापती सुनील देवकर, मंडलाध्यक्ष सुनील कदम, दीपक चौधरी, संचालक निलेश देवकर यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

