‘आधी निधी आणा, मग भूमिपूजन करा’; प्रभाग ११, १२, १३ आणि दत्तनगरच्या रस्त्यांवरून कोपरगावातील राजकारण तापले
वृत्त वेध कोपरगाव :
शहरातील प्रभाग क्रमांक ११, १२, १३ आणि दत्तनगर भागातील रस्त्यांसाठी आमदार आशुतोष काळे यांनी निधी मंजूर करून आणला असताना, सत्ताधाऱ्यांकडून या विकासकामांचे अनधिकृत उद्घाटन करून आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा प्रकार सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील गंगुले यांनी केला. ‘आधी स्वतः निधी आणा आणि मग भूमिपूजन करा,’ असा थेट टोला लगावत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.
कोपरगाव नगरपरिषदेत विकासकामांच्या श्रेयावरून सत्ताधारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत शहरातील विकासकामे, रस्ते, मोकाट जनावरे आणि नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले.
‘निधी आमदारांचा, श्रेय सत्ताधाऱ्यांचे?’
शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करून आणला आहे. या कामांचा नागरिकांना लाभ होत असताना नगरपरिषद सत्ताधारी मात्र त्याचे श्रेय घेण्यात व्यस्त आहेत, असा आरोप गंगुले यांनी केला.
नगरपरिषद निवडणुकीपूर्वी जनतेला १०० दिवसांत शहरातील प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आठ ते नऊ महिने उलटूनही ठोस कामे झालेली नाहीत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला.
रस्त्यांचे उद्घाटन अनधिकृत? राष्ट्रवादीचा दावा
प्रभाग ११, १२, १३ आणि दत्तनगर परिसरातील रस्त्यांचे सत्ताधाऱ्यांनी छुप्या पद्धतीने उद्घाटन केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला.
या उद्घाटनाबाबत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे अधिकृत माहिती मागविण्यात आली असता, संबंधित उद्घाटन अनधिकृतपणे झाल्याचे लेखी उत्तर मिळाल्याचा दावा गंगुले यांनी केला.
नगरपरिषदेची परवानगी न घेता तसेच मुख्याधिकारी किंवा संबंधित कर्मचाऱ्यांना न बोलावता उद्घाटन करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. रस्त्यांसाठीचा निधी आमदार आशुतोष काळे यांनी मंजूर करून आणलेला असताना सत्ताधाऱ्यांकडून त्याचे श्रेय लाटले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
मोकाट जनावरे, गटारींचे ढापे आणि मुरमाचा मुद्दा ऐरणीवर
शहरातील गटारींवरील ढापे, मुरमाचा कथित घोटाळा आणि मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. मोकाट जनावरांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असतानाही प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मंदार पहाडे यांनी केला.
‘शहरातील ज्वलंत प्रश्न सोडविण्याऐवजी आमदार आशुतोष काळे यांनी मंजूर केलेल्या कामांच्या उद्घाटनातच सत्ताधाऱ्यांचा वेळ जात आहे,’ असा टोला पहाडे यांनी लगावला.
‘ऑक्टोबर २०२५ ची वर्क ऑर्डर; मग निधी आणला कसा?’
दत्तनगर भागातील रस्त्याची वर्क ऑर्डर ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या वेळी कोल्हे गटाचा नगराध्यक्ष नव्हता आणि नगरपरिषदेत त्यांची सत्ताही नव्हती. त्यामुळे ‘मग या कामाचा निधी सत्ताधाऱ्यांनी आणला कसा?’ असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वाल्मिक लहिरे यांनी उपस्थित केला.
‘नगरपरिषद तुमची खाजगी मालमत्ता नाही’
नगरपरिषदेत सत्ता आली म्हणून ती स्वतःची खाजगी मालमत्ता असल्याप्रमाणे कारभार करू नका, असा थेट इशारा सुनील गंगुले यांनी दिला.
‘राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. चुकीच्या आणि समाजहिताच्या नसलेल्या प्रत्येक निर्णयाला यापुढेही विरोध केला जाईल. सत्तेचा उपयोग नागरिकांच्या हितासाठी करा,’ असे गंगुले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या आरोपांवर सत्ताधारी नगरपरिषद किंवा संबंधितांकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळाल्यास तीही महत्त्वाची ठरणार आहे.
पत्रकार परिषदेस उपस्थिती
पत्रकार परिषदेस मंदार पहाडे, विरेन बोरावके, वाल्मिक लहिरे, संदीप कपिले, राजेंद्र वाकचौरे, सचिन गवारे आणि फाकीर कुरेशी उपस्थित होते.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
