कोपरगाव वृत्तवेध :
शहरातील रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये मोकाट जनावरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असताना आणि त्यांच्या उपद्रवामुळे वाहतूक कोंडी, अपघात तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असताना कोपरगाव नगरपरिषदेने अखेर थेट मैदानात उतरून स्वतःची गोशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. दोन वेळा निविदा प्रक्रिया राबवूनही कुणी पुढे न आल्याने आणि विद्यमान गोशाळांनी जागेअभावी जनावरे स्वीकारण्यास नकार दिल्याने नगरपरिषद प्रशासनाने हा निर्णायक आणि धाडसी मार्ग स्वीकारला आहे.
गोप्रेमी नागरिकांच्या सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या या गोशाळेच्या कामाला मंगळवार, दि. १८ ऑगस्ट २०२६ पासून प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. प्रारंभी जागेची लेव्हलिंग, साफसफाई आणि इतर आवश्यक पूर्वतयारीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
नगराध्यक्ष पराग संधान यांच्या उपस्थितीत तसेच सर्व सभापती, नगरसेवक, पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न सोडविण्यासाठी यापूर्वी नगरपरिषदेकडून जनावरे पकडून विविध गोशाळांमध्ये पाठविण्याची मोहीम राबविण्यात आली होती. मात्र अनेक गोशाळांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त जनावरे असल्याने नव्याने जनावरे स्वीकारण्यास नकार दिला जात होता.
यामुळे शहरातील समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत होती. अखेर या प्रश्नावर कायमस्वरूपी आणि स्थानिक पातळीवर प्रभावी उपाय म्हणून नगरपरिषदेने स्वतःची गोशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
मोकाट जनावरांचा प्रश्न हा केवळ जनावरांच्या व्यवस्थापनापुरता मर्यादित नसून तो नागरिकांची सुरक्षितता, वाहतुकीची शिस्त, अपघातांचे प्रमाण आणि शहराच्या स्वच्छतेशी थेट संबंधित आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे हे पाऊल शहरवासीयांसाठी मोठा दिलासा देणारे ठरणार असून, मोकाट जनावरांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दिशेने उचललेले हे पाऊल कोपरगावसाठी अनुकरणीय मानले जात आहे.
पूर्वी कोंडवाडा, आता गोशाळा; नियम मात्र कडक हवेत!
कोपरगाव नगरपरिषदेचा स्वतःची गोशाळा उभारण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र गोशाळा म्हणजे मोकाट जनावरांसाठी ‘मुक्त निवारा’ नव्हे, तर शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीच्या शिस्तीसाठी प्रभावी व्यवस्थापन केंद्र ठरले पाहिजे. पूर्वी कोंडवाड्यात ज्या पद्धतीने मोकाट जनावरे पकडून ठेवली जात होती, त्याच धर्तीवर जनावरांच्या मालकांवर जबाबदारी निश्चित करणारे कडक नियम गोशाळेसाठीही असणे गरजेचे आहे.
मोकाट जनावर पकडल्यानंतर संबंधित मालकाचा शोध घेऊन त्याच्याकडून दंड वसूल करणे, जनावर पुन्हा रस्त्यावर सोडल्यास वाढीव दंडाची तरतूद करणे आणि वारंवार नियम मोडणाऱ्या मालकांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा नगरपरिषद जनावरे पकडत राहणार आणि मालक पुन्हा ती रस्त्यावर सोडत राहणार, असे दुष्टचक्र सुरूच राहील.
गोशाळा जनावरांसाठी आसरा देईल; पण मालकांना बेजबाबदारपणाची मोकळीक देणार नाही, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी.
जनावरांचे संरक्षण आणि नागरिकांची सुरक्षा—दोन्हींचा समतोल साधणारी कडक अंमलबजावणी झाली, तरच नगरपरिषदेच्या या निर्णयाला खऱ्या अर्थाने यश मिळेल.
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
