कोपरगाव वृत्तवेध:
विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहून व्यसनमुक्त जीवन जगावे. तसेच मोबाईलचा वापर आवश्यक शैक्षणिक आणि विधायक कामांसाठीच करून त्याचा अतिवापर टाळावा, असे आवाहन कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी केले.
संजीवनी अकॅडमीच्या विद्यार्थी परिषद २०२६-२७ पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे, संजीवनी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. ए. जी. ठाकूर, एक्झिक्युटिव्ह प्रिन्सिपल सुधा सुब्रमण्यम, प्रिन्सिपल अनुश्रीता सिंग आदी उपस्थित होते.
मोबाईलचा अतिवापर गंभीर समस्या
उद्धव डमाळे म्हणाले, “आज मोबाईलचा अतिवापर ही विद्यार्थ्यांसमोरील गंभीर समस्या बनत आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी या वयातच व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवून निरोगी, शिस्तबद्ध आणि जबाबदार जीवनशैली अंगीकारावी.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधींना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. विविध विभागांसाठी निवड झालेल्या २४ विद्यार्थी प्रतिनिधींना नियुक्ती प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांची निवड लोकशाही पद्धतीने मतदानाद्वारे करण्यात आली.
हेड गर्लपदी स्वरा कैलास आढाव, तर व्हाइस हेड गर्लपदी जान्हवी पटेल यांची निवड झाली.
नेतृत्वाची संधी व्यक्तिमत्त्व विकासासाठी वापरा
संजीवनी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. ए. जी. ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मिळालेली नेतृत्वाची संधी व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोगात आणण्याचे आवाहन केले. सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतानाच स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
“नेतृत्व म्हणजे सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे”
संचालिका डॉ. मनाली कोल्हे म्हणाल्या, “विद्यार्थी परिषद ही केवळ पद किंवा अधिकाराचे प्रतीक नसून नेतृत्व, जबाबदारी, शिस्त, संघभावना आणि लोकशाही मूल्ये आत्मसात करण्याची संधी आहे.”संवाद कौशल्य, वेळेचे नियोजन, समस्या सोडविण्याची क्षमता आणि सामाजिक जबाबदारी विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले.
“खरा नेता आदेश देणारा नसतो, तर सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारा असतो. संस्थापक अध्यक्ष स्व. शंकरराव कोल्हे हे माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांनी नेहमी आघाडीवर राहून नेतृत्व केले आणि आपल्या टीमचे म्हणणे मनापासून ऐकले. त्यामुळे कार्यकाळाच्या शेवटी कोणते पद भूषविले यापेक्षा सोपविलेली जबाबदारी किती प्रामाणिकपणे व प्रभावीपणे पार पाडली, हे अधिक महत्त्वाचे आहे,” असे डॉ. मनाली कोल्हे यांनी सांगितले.
संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी नवनिर्वाचित विद्यार्थी परिषद सदस्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पोस्ट आवडली like, share follow करा
