चार-पाच दिवसांत १०० हून अधिक जनावरे पकडली; ६७ गोशाळेत, ३३ पेक्षा जास्त कोंडवाड्यात | ‘गाय सोडा, २०-२५ हजार दंड भरतो’; पालिका मात्र कारवाईवर ठाम
कोपरगाव वृत्तवेध:
शहरातील रस्त्यांवर मोकाट सोडल्या जाणाऱ्या गोवंशाच्या प्रश्नावर अखेर कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने ‘धरपकड’ मोहीम तीव्र केली आहे. अवघ्या चार-पाच दिवसांत मोकाट जनावरे पकडण्याची संख्या शंभरच्या पुढे गेली असून, ६७ जनावरे कोकमठाण येथील गोशाळेत पाठविण्यात आली आहेत. गोशाळेची क्षमता पूर्ण झाल्याने ३३ पेक्षा अधिक जनावरे पालिकेच्या कोंडवाड्यात ठेवण्यात आली आहेत.
या धडक कारवाईने रस्त्यावर जनावरे मोकाट सोडून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या मालकांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे पकडलेली जनावरे सोडविण्यासाठी काही मालकांनी २० ते २५ हजार रुपये दंड भरण्याची तयारी दर्शविल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, कारवाई सुरू असल्याने सध्या कोणतीही माघार नाही, अशी भूमिका नगरपालिका प्रशासनाने घेतली आहे.
‘दंड भरतो, गाय सोडा!’ — पालिकेचा स्पष्ट नकार
मोकाट जनावरांची धरपकड सुरू झाल्यानंतर काही मालकांनी पालिका प्रशासनाकडे धाव घेतली. ‘‘गाय सोडून द्या, २०-२५ हजार रुपये दंड भरतो,’’ अशी विनंती करण्यात आली. मात्र मुख्याधिकारी अजित निकत यांनी ‘‘आता कारवाई सुरू आहे; बाकीचा विचार नंतर करू,’’ अशी स्पष्ट भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे मोकाट जनावरे रस्त्यावर सोडण्याची सवय असलेल्या मालकांना पालिकेच्या कारवाईचा चांगलाच धसका बसला आहे.
गोशाळा फुल्ल; कोंडवाड्यात ३३ पेक्षा अधिक जनावरे
कोकमठाण येथील गोशाळेत आतापर्यंत ६७ जनावरे पाठविण्यात आली आहेत. मात्र गोशाळेची क्षमता पूर्ण झाल्यामुळे त्यानंतर पकडण्यात आलेली जनावरे पालिकेच्या कोंडवाड्यात ठेवण्यात आली आहेत. आणखी २०-२१ जनावरे पकडण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अजित निकत यांनी दिली.
गोशाळेची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने येवला व आसपासच्या परिसरातील गोशाळांशी संपर्क साधण्यात आला असून, तेथेही काही जनावरे पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी सांगितले.
‘गोवंशाचा पूर्ण बंदोबस्त होईपर्यंत कारवाई सुरूच’
‘शहरातील मोकाट जनावरांचा पूर्ण बंदोबस्त झाल्याशिवाय कारवाई कोणत्याही परिस्थितीत थांबविली जाणार नाही,’ असा ठाम इशारा नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिला आहे.
नगरपालिका प्रशासन स्वतःची गोशाळा उभारण्याच्या तयारीत असून, ती लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अजित निकत यांनी दिली. त्यामुळे भविष्यात पकडलेल्या जनावरांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न अधिक प्रभावीपणे हाताळता येणार आहे.
राजकीय हस्तक्षेप नको; नियमाप्रमाणे कारवाई हवी!
मोकाट जनावरांचा प्रश्न अनेक वर्षांपासून शहरवासीयांच्या डोक्यावर आहे. अपघात, वाहतुकीचे अडथळे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असतानाही हा प्रश्न वारंवार पुढे ढकलला जात होता. आता प्रशासनाने कारवाई सुरू केली असल्याने राजकीय दबाव किंवा हितसंबंधांना बळी न पडता नियमाप्रमाणे कठोर कारवाई सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
मोकाट जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर वचक निर्माण झाला, तरच रस्त्यावर जनावरे सोडण्याच्या प्रवृत्तीला आळा बसेल. अन्यथा आज पकडलेली जनावरे उद्या पुन्हा रस्त्यावर येण्याची शक्यता कायम राहणार आहे.
मोकाट कुत्र्यांचाही ‘बंदोबस्त’ कधी?
गोवंशाचा प्रश्न हाताळताना शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येकडेही पालिका प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कुत्र्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास आणि सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता निर्बीजिकरण, लसीकरण व नियमानुसार व्यवस्थापनाची प्रभावी मोहीम राबविण्याची गरज आहे.
चार दिवसांत फरक जाणवू लागला!
गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मोहिमेमुळे शहरातील मोकाट जनावरांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे चित्र दिसत असल्याचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी सांगितले.
आता खरी कसोटी कारवाईची सातत्याची!
शंभरचा आकडा पार करणारी ही धरपकड नागरिकांना दिलासा देणारी असली, तरी कारवाई सातत्याने सुरू राहिली आणि पकडलेल्या जनावरांच्या मालकांवर नियमाप्रमाणे कठोर कारवाई झाली, तरच कोपरगावच्या रस्त्यांना मोकाट गोवंशापासून कायमची मुक्ती मिळेल. त्यामुळे पालिकेची ही मोहीम पुढेही तितक्याच निर्धाराने सुरू राहते का, याकडे कोपरगावकरांचे लक्ष लागले आहे.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
