कोपरगाव वृत्तवेध:
“नागरिकांच्या अडचणी वेळेत सुटल्या पाहिजेत, प्रशासन गतिमान आणि उत्तरदायी असले पाहिजे, हीच स्वर्गीय अजितदादा पवार यांची कार्यशैली होती. त्यांच्या नावाने सुरू झालेल्या ‘गतिमान नागरी सेवा पुरस्काराचा’ खरा सन्मान करायचा असेल, तर शिबिरापुरती नव्हे, तर वर्षभर वेगवान, पारदर्शक आणि परिणामकारक सेवा नागरिकांना मिळाली पाहिजे,” असा स्पष्ट संदेश आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासनाला दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कोपरगावातील महात्मा गांधी प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट हॉल येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात’ उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर थेट भाष्य केले.
आमदार काळे म्हणाले, शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचणे हीच स्व. अजितदादांची खरी कार्यसंस्कृती होती. नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित ठेवण्याऐवजी त्यांचे तातडीने निराकरण करण्यावर त्यांचा कायम भर होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीही नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन उभारण्याचा महायुती सरकारचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्व. अजितदादा पवार यांनी शेती, सहकार, दुग्धव्यवसाय, साखर उद्योग, ग्रामविकास, नगरविकास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यास करून विकासाचा वेग कायम ठेवला. त्यांची शिस्तप्रिय कार्यपद्धती प्रशासनासाठी आदर्श असल्याचे सांगत, प्रत्येक अधिकाऱ्याने ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कारामागील’ उद्देश समजून उत्कृष्ट सेवेसाठी स्पर्धा निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरू केलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ हे महायुती सरकारच्या लोकाभिमुख प्रशासनाचे प्रभावी उदाहरण असल्याचे सांगताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून हे अभियान यशस्वीपणे राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
“शिबिराच्या एका दिवसापुरती गतिमान सेवा नको, तर वर्षभर प्रशासनाचा वेग कायम राहिला पाहिजे. कोपरगाव मतदारसंघातील एकाही पात्र लाभार्थ्याला शासनाच्या योजनांपासून वंचित राहू देणार नाही,” असा निर्धार व्यक्त करत आमदार काळे यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांना तातडीने न्याय देण्याचे निर्देश दिले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार महेश सावंत, शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, गटविकास अधिकारी स्वप्निल वाळुंज, नगरपरिषद मुख्याधिकारी अजित निकत, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी महेबूब शेख, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, सहकारी संस्था सहाय्यक निबंधक संदीपकुमार रुद्राक्ष, भूमी अभिलेख उपअधीक्षक राजेंद्र खरोटे, बालविकास प्रकल्प अधिकारी रुपाली धुमाळ, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रवीण शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, विविध विभागांचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
