कोपरगाव | वृत्तवेध :
पावसाळ्यातील साथीचे आजार वाढल्यानंतर उपाययोजनांसाठी धावपळ करण्याऐवजी संभाव्य परिस्थितीचा वेळीच अंदाज घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. शहरात व ग्रामीण भागात कुठेही डासांची पैदास होणार नाही, यासाठी आरोग्य विभागाने तातडीने प्रभावी मोहीम हाती घ्यावी, असे कडक निर्देश आमदार आशुतोष काळे यांनी दिले.
मंगळवारी (दि. २८) आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव एकात्म आरोग्य वर्धिनी समितीची बैठक पार पडली. बैठकीत शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ तळागाळातील रुग्णांपर्यंत पोहोचविणे, ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणे, रुग्णालयांतील आरोग्य सेवा, उपलब्ध सुविधा आणि रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साचली आहेत. त्यामुळे डासांची पैदास वाढून डेंग्यू, मलेरिया आणि अन्य पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सतर्क राहून डास प्रतिबंधक औषध फवारणीसाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रे तातडीने दुरुस्त करावीत आणि प्रत्येक भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशा सूचना आ. काळे यांनी दिल्या.
यावेळी आ. काळे म्हणाले की, तालुक्यातील ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींसह विविध अडचणी दूर करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मागील पाच वर्षांत कोपरगाव तालुक्यात आरोग्य विभागासाठी मोठ्या प्रमाणात विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. पूर्वी केवळ घोषणा झाल्या; मात्र आता प्रत्यक्ष कामांना गती देण्यात आली आहे.
कोपरगाव शहरात १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम वेगाने सुरू आहे. माहेगाव देशमुख येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित झाले असून संवत्सर येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. तसेच संवत्सर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कोकमठाण येथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे.
सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी सर्वप्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात जातो. त्यामुळे या आरोग्य संस्थांची यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना पुरेशा प्रमाणात औषधे, लसीकरण आणि आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरूच राहील, असेही आ. काळे यांनी स्पष्ट केले.
पावसाळ्यात डेंग्यूच्या डासांची पैदास वाढू नये, यासाठी आरोग्य विभागाने प्रत्येक भागात नियमित सर्वेक्षण, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. कोणत्याही रुग्णाची गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी घेऊन नागरिकांना वेळेत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीस तहसीलदार महेश सावंत, गटविकास अधिकारी स्वप्नील वाळूंज, संदीप दळवी, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गिरीश गुट्टे, तालुका आरोग्य अधिकारी विकास घोलप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सीताराम दहीफळे, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्यासह एकात्म आरोग्य वर्धिनी समितीचे सदस्य उपस्थित होते.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
