कोपरगाव | वृत्तवेध: “कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) भविष्यातील जग बदलू शकते; पण तिचा योग्य वापर, योग्य दिशा आणि प्रभावी नियंत्रण हे फक्त मानवी ज्ञान, विवेक आणि कौशल्यामुळेच शक्य आहे.” बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ गुणांपुरते मर्यादित न राहता नव्या कौशल्यांचा सातत्याने स्वीकार करावा, असे स्पष्ट प्रतिपादन संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी केले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या एमएचटी-सीईटी परीक्षेत ३७ विद्यार्थ्यांनी ९० ते ९९.९९ पर्सेन्टाइल मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा गौरव समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. मनाली अमित कोल्हे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना अमित कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना संजीवनीच्या जागतिक स्तरावर कार्यरत माजी विद्यार्थ्यांशी जोडणाऱ्या ‘अल्युम्नी पोर्टल’वर नोंदणी करण्याचे आवाहन केले. करिअरच्या नव्या संधी, मार्गदर्शन आणि उद्योगविश्वाशी संपर्कासाठी हे व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरेल, असे त्यांनी सांगितले.
एमएचटी-सीईटी परीक्षेत प्रथमेष रवींद्र गोसावी याने ९९.९९ पर्सेन्टाइल मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. सिद्धेश प्रशांत क्षत्रिय (९९.२० पर्सेन्टाइल) द्वितीय, तर शौर्य संतोष थोरात (९६.०८ पर्सेन्टाइल) तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.
संजीवनी ज्युनिअर कॉलेजची ही अकरावी बॅच असून संस्थेने सलग शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखल्याचा अभिमान अमित कोल्हे यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांची निष्ठा आणि पालकांचे सहकार्य हेच खरे बळ असल्याचे त्यांनी नमूद केले. अभ्यासाबरोबरच खेळ, स्पर्धा आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी झाल्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि तणाव कमी होतो, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. मनाली कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, हा गौरव केवळ गुणांचा नाही, तर मेहनत, शिस्त, चिकाटी आणि समर्पणाचा आहे. प्रत्येक यशामागे पालकांचा त्याग आणि शिक्षकांचे मार्गदर्शन असते. पैसा, पद आणि प्रतिष्ठेपेक्षा ज्ञान हीच आयुष्यभर साथ देणारी खरी संपत्ती असल्याने विद्यार्थ्यांनी समाज आणि राष्ट्रासाठी योगदान देणारे नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास डॉ. राजन शेंडगे, डॉ. विपुल पटेल, प्रा. रेखा साळुंके यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
