अकोले वृत्तवेध: आढळा नदीला ७ जुलैच्या मध्यरात्री आलेल्या महापुराने नदीकाठच्या शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. सुपीक शेती, उभी पिके आणि नदीकाठची जमीन पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
मात्र, नुकसानीनंतरही प्रशासनाकडून तातडीने पंचनामे न झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने प्रशासनाला धारेवर धरत पुरग्रस्तांना तातडीने न्याय देण्याची मागणी केली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे अहिल्यानगर जिल्हाप्रमुख जगदीश चौधरी यांनी अकोले तहसीलदारांना निवेदन सादर करून समशेरपूर, सावरगाव पाट, टाहाकारी आणि केळी या गावांतील बाधित शेतकऱ्यांच्या शेतजमिनी व पिकांचे त्वरित प्रत्यक्ष पंचनामे करण्याची मागणी केली आहे. शासनाने विलंब न करता नुकसानग्रस्तांना योग्य आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनासोबत समशेरपूर परिसरातील बाधित शेतकऱ्यांची नावे व सह्याही जोडण्यात आल्या आहेत. प्रशासनाने कागदोपत्री प्रक्रिया न राबवता प्रत्यक्ष शेतात जाऊन वस्तुस्थितीची पाहणी करावी आणि मदत तत्काळ मंजूर करावी, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.
जिल्हाप्रमुख जगदीश चौधरी यांच्यासह तालुकाप्रमुख महेश नवले, शहरप्रमुख नितीन नाईकवाडी, विधानसभा प्रमुख माधवराव तिटने तसेच नितीन बेनके, अतुल लोहटे, संभाजी जाधव, बाळा नेहे, सलमान शेख, संदीप राक्षे, लहानू बेनके, लखपती कोटकर आणि अनेक शेतकऱ्यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
वृत्तवेध :
पूर ओसरला, पण शेतकऱ्यांच्या संकटाचा महापूर अजूनही कायम आहे. पंचनामे आणि मदत जाहीर करण्यात दिरंगाई झाली, तर पुराच्या पाण्यापेक्षा प्रशासनाच्या उदासीनतेचा फटका शेतकऱ्यांना अधिक बसणार आहे. आता सरकारने आश्वासनांऐवजी थेट मदतीची कृती दाखविण्याची वेळ आली आहे.
