कोपरगाव वृत्तवेध:
कोपरगाव-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६०ची दुरवस्था आता केवळ वाहतुकीचा प्रश्न राहिलेला नसून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर विषय बनला आहे. खड्डे, उखडलेला रस्ता आणि रखडलेली कामे यामुळे या मार्गावरील प्रवास धोकादायक झाला असून, रस्त्याच्या प्रश्नावर शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक संजय बबुताई भास्करराव काळे यांनी २५ ऑगस्टपासून दररोज १० किलोमीटर पायी चालत अहिल्यानगरकडे जाण्याचा निर्धार केला आहे. नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हा पायी प्रवास असल्याचे काळे यांनी सांगितले.
रामा-१६०चा मोठा भाग सात विधानसभा मतदारसंघांच्या हद्दीतून जातो. या पट्ट्यात १० आमदार आणि २ खासदारांचे लोकप्रतिनिधित्व असतानाही महामार्गाच्या दुरवस्थेवर अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नसल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दररोज हजारो नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि नोकरदार या मार्गाचा वापर करतात. मात्र रस्त्यावरील खड्डे आणि रखडलेल्या कामांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.
रस्त्याच्या कामाची गुणवत्ता, काम पूर्ण होण्यास होणारा विलंब तसेच संबंधित कंत्राटदार कंपन्यांवर करण्यात आलेली किंवा प्रस्तावित कारवाई याबाबत प्रशासनाने पारदर्शक भूमिका जाहीर करावी, अशी मागणीही पुढे आली आहे.
काळे म्हणाले, “रामा-१६०ची अवस्था पाहता नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्ता मजबूत, गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबत शासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांनी स्पष्ट भूमिका घ्यावी. केवळ आरोप-प्रत्यारोप न करता प्रत्यक्ष कामाला गती देणे गरजेचे आहे.”
“हा कोणत्याही पक्षाविरोधातील लढा नसून नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठीचा आवाज आहे. माझ्या पायी प्रवासाची दखल घेऊन प्रशासनाने रामा-१६०च्या प्रश्नावर ठोस निर्णय घ्यावा,” असेही काळे यांनी स्पष्ट केले.
रामा-१६०च्या पट्ट्यातील लोकप्रतिनिधित्व
कोपरगाव : २ आमदार,शिर्डी : १ आमदार, १ खासदार
संगमनेर : २ आमदार,अकोले : १ आमदार,श्रीरामपूर : १ आमदार
राहुरी : २ आमदार,अहिल्यानगर : १ आमदार, १ खासदार
एकूण : १० आमदार + २ खासदार
जनतेला उत्तर कधी मिळणार?
रामा-१६०च्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज आहे. रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार? कामाची गुणवत्ता कोण तपासणार? आणि नागरिकांना सुरक्षित प्रवास कधी मिळणार? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे जनतेला मिळणे आवश्यक आहे.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
