कोपरगाव वृत्तवेध :
सावळीविहीर फाटा ते अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160च्या कामाच्या दर्जावर सामाजिक कार्यकर्ते संजय बबुताई भास्कराव काळे यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “आम्ही भारतीय गिनीपिग नाही; रस्त्याच्या कामाच्या नावाखाली आमच्यावर प्रयोग करू नका!” असा संतप्त सवाल करत त्यांनी NHAIकडे रस्त्याचे तातडीने IIT, NIT किंवा BHUमधील तज्ज्ञांकडून थर्ड पार्टी ऑडिट करण्याची मागणी केली आहे.
NHAIच्या १८ ऑगस्ट २०२६ रोजीच्या पत्राला उत्तर देताना काळे यांनी सावळीविहीर फाटा ते अहिल्यानगर मार्गाच्या दुरवस्थेवर रोखठोक भूमिका घेतली. रस्त्याचे काम सुरू असतानाच काही दिवसांत डांबरीकरण उखडत असेल, तर रस्त्याचा पाया आणि बांधकामाची गुणवत्ता तपासणार कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
५० टक्के काम झाले म्हणता; मग सध्याच्या ठेकेदाराने केले तरी काय?
या मार्गाचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. निविदाही निघाल्या. मात्र पहिले दोन ठेकेदार काम अर्धवट सोडून गेले. त्यानंतर काँक्रिटीकरणाचा निर्णय बाजूला पडला आणि खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली. नव्या निविदेनंतर एप्रिल 2025 मध्ये तिसरा ठेकेदार कामावर आला.
NHAIच्या पत्रात ठेकेदाराने ५० टक्के काम पूर्ण केल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र काळे यांच्या म्हणण्यानुसार, या कामातील मोठा हिस्सा मागील दोन ठेकेदारांच्या कार्यकाळातील आहे. त्यामुळे सध्याच्या ठेकेदाराने नेमके किती काम केले, किती निधी खर्च केला आणि त्या कामाचा दर्जा काय? याचा हिशेब जनतेसमोर मांडावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दहा वर्षांचा DLP असेल तर खड्डे बुजविण्याची नवी निविदा कशासाठी?
NHAIकडूनच रस्त्याच्या कामासाठी 10 वर्षांचा दोष दायित्व कालावधी (DLP) असल्याचे सांगण्यात आले आहे. या कालावधीत रस्त्यावर निर्माण होणारे दोष व खड्डे दुरुस्त करण्याची जबाबदारी ठेकेदाराची असल्याचेही नमूद आहे.
मग रस्त्याचे काम सुरू असतानाच खड्डे बुजविण्यासाठी स्वतंत्र निविदा काढण्याची वेळ का येते? दहा वर्षांची हमी प्रत्यक्षात कोण देणार? ठेकेदाराकडून घेतलेली बँक हमी किती आहे? असे थेट प्रश्न काळे यांनी उपस्थित केले आहेत.
‘ब्रिटिशांचा रस्ता टिकला, स्वातंत्र्यानंतरचा दोन वर्षेही का नाही?’
रस्त्याच्या गुणवत्तेवर भाष्य करताना काळे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच सवाल केला आहे. “ब्रिटिशांनी केलेले रस्ते दीर्घकाळ टिकले; मग स्वातंत्र्यानंतरचे डांबरी रस्ते दोन वर्षेही का टिकत नाहीत? BOT पद्धतीच्या रस्त्यांवर दहा वर्षे खड्डे पडत नाहीत, मग येथेच अशी परिस्थिती का?” असा सवाल त्यांनी केला आहे.
निविदा, खर्च आणि बँक हमीचा हिशेब जनतेसमोर द्या
काळे यांनी NHAIकडे पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत—
सावळीविहीर फाटा ते अहिल्यानगर रस्त्याचे IIT/NIT/BHU तज्ज्ञांकडून थर्ड पार्टी ऑडिट करावे.
मागील तीन निविदा, कार्यारंभ आदेश आणि झालेल्या खर्चाचा संपूर्ण तपशील सात दिवसांत सार्वजनिक करावा.
दहा वर्षांच्या DLPसाठीची बँक हमीची प्रत सार्वजनिक करावी.
२००६ मध्ये तोडलेल्या सुमारे ३८०० वृक्षांच्या बदल्यात वृक्षारोपण व पाच वर्षांच्या संगोपनाचे शपथपत्र द्यावे.
सावळीविहीर ते अहिल्यानगर मार्ग पुढील दहा वर्षे खड्डेमुक्त राहील, याचे लेखी हमीपत्र द्यावे.
उत्तर न मिळाल्यास २५ ऑगस्टला सत्याग्रह
या मागण्यांवर समाधानकारक उत्तर न मिळाल्यास २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता सत्याग्रहास बसणार, असा इशारा संजय काळे यांनी दिला आहे.
रस्ता हा केवळ डांबराचा पट्टा नाही; तो हजारो प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न आहे. त्यामुळे निकृष्ट काम करून पुन्हा-पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली जनतेच्या पैशांचा अपव्यय करण्याऐवजी एकदाच दर्जेदार रस्ता उभा करा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
“आम्ही भारतीय गिनीपिग नाही. आम्हाला प्रयोग नकोत; आम्हाला टिकाऊ, सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता हवा!” असा रोखठोक संदेश देत संजय काळे यांनी NHAIसमोर आव्हान उभे केले आहे.
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
