शिर्डी : गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साईनगरीत प्रामाणिकपणाचा प्रेरणादायी आदर्श पाहायला मिळाला. भाविकांची मोठी गर्दी असतानाही हरवलेली ₹१५,४१० रोख रक्कम असलेली पर्स एका साईभक्त महिलेने कोणताही मोह न बाळगता श्री साईबाबा संस्थानच्या संरक्षण विभागाकडे सुपूर्द केली.
संरक्षण विभागानेही तत्परता दाखवत काही वेळातच ती पर्स मूळ मालकाच्या हाती सुखरूप पोहोचवून सेवाभाव आणि विश्वासाची परंपरा कायम राखली.
श्री साईबाबा मंदिरातील पारायण कक्षात पारायण करत असताना सौ. अनुपमा निरंजन (रा. बेंगळुरू) यांना ही पर्स आढळली. पर्समध्ये ₹१५,४१० रोख रक्कम आणि आधार कार्ड होते. त्यांनी ती तत्काळ संस्थानच्या संरक्षण कार्यालयात जमा केली.
संरक्षण विभागाने आधार कार्डच्या आधारे चौकशी करून ती श्री जी. व्ही. राजू (रा. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश) यांची असल्याचे निष्पन्न केले. मंदिर परिसरात उद्घोषणा केल्यानंतर श्री. राजू संरक्षण कार्यालयात दाखल झाले. आवश्यक पडताळणीनंतर त्यांना त्यांची पर्स व संपूर्ण रक्कम सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आली.
सौ. अनुपमा निरंजन यांच्या प्रामाणिकपणाबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार करून विशेष अभिनंदन केले.
संरक्षण विभाग प्रमुख रोहिदास माळी यांच्या नेतृत्वाखाली संस्थानचा संरक्षण विभाग मंदिर परिसर, भक्तनिवास आणि इतर ठिकाणी सापडणाऱ्या हरवलेल्या वस्तू मूळ मालकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने करत आहे. आजवर विभागाने ₹८५ लाखांहून अधिक किमतीची रोख रक्कम, दागिने, मोबाईल, घड्याळे, पर्स आणि इतर मौल्यवान वस्तू संबंधित भाविकांना परत करून विश्वासाचे नाते अधिक दृढ केले आहे.
‘साईसेवा हीच मानवसेवा’ या ब्रीदाला साजेशी ठरलेली ही घटना श्रद्धा, सचोटी आणि सेवाभावाचा संदेश अधिक दृढ करणारी ठरली असून श्री साईबाबा संस्थानच्या सेवाभिमुख कार्याचा आणखी एक प्रेरणादायी अध्याय म्हणून भाविकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.
