कोपरगाव | प्रतिनिधी
दैनंदिन धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात काही क्षणांचा निखळ आनंद देणारे प्रभावी माध्यम म्हणजे संगीत असून कराओके गायकांचा परिवार समाजाला सकारात्मक ऊर्जा देण्याचे कार्य करीत आहे, असे प्रतिपादन ग्रीड इंडियाचे संचालक तथा ज्योती पतसंस्थेचे चेअरमन ॲड. रविकाका बोरावके यांनी केले.
कराओके सिंगर्स क्लब, कोपरगावच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त कृष्णाई बँक्वेट हॉल येथे आयोजित ‘ये शाम मस्तानी म्युझिकल कॉन्सर्ट’ या विशेष कार्यक्रमात त्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला सौ. पुष्पाताई काळे, सौ. रेणुका कोल्हे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, संजीवनी सैनिकीचे संचालक सुमित कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान, गणेश आढाव, सुशांत घोडके, सागर बडदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कराओके समूहाचे प्रमुख राजेंद्र कोयटे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात रोहित दुग्गल म्युझिक (आर.डी. म्युझिक) अॅकॅडमी, श्रीरामपूरच्या वादकांनी साथ दिली. कोपरगावातील हौशी गायक-गायिकांनी हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर गीतांचे सादरीकरण करत रसिकांना सुरांच्या अनोख्या विश्वात नेले.
रोमँटिक, भावगीत आणि विरहगीतांच्या सुरेल सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.प्रा. डॉ. धनंजय क्षीरसागर, डॉ. विलास आचारी, प्रा. हरेश चौधरी, ॲड. श्रद्धा जवाद, डॉ. समीर शहा, प्रिया ठोळे, वर्षा सोनवणे, डॉ. अरुण भांडगे, कल्याणी बनसोडे, डॉ. सोनिया रणदिवे यांच्यासह अनेक स्थानिक गायक-गायिकांनी आपल्या गायनकौशल्याची मोहोर उमटवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कोयटे, प्रा. डॉ. शैलेंद्र बनसोडे आणि प्रिया ठोळे यांनी केले. संगीतप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘ये शाम मस्तानी’ ही मैफल कोपरगावच्या सांस्कृतिक विश्वातील संस्मरणीय पर्व ठरली.
ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.
