३० जुलैनंतर अनुदान बंद पडू शकते!

कोपरगाव | वृत्तवेध प्रतिनिधी : राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ३० जुलै ही अत्यंत महत्त्वाची अंतिम मुदत ठरत आहे.

शासनाच्या निर्देशानुसार ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असून, वेळेत प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांच्या अनुदान व निवृत्तीवेतनाच्या वितरणात अडथळे निर्माण होऊ शकतात, असा इशारा देत आमदार आशुतोष काळे यांनी सर्व लाभार्थ्यांना तातडीने ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.


ई-केवायसीसाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक आणि आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या सेतू सुविधा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र, तहसील कार्यालय अथवा संबंधित शासकीय कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रामीण भागातील नागरिकांनी ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.


विशेषतः ज्येष्ठ नागरिक, निराधार महिला, विधवा, दिव्यांग आणि गरजू लाभार्थ्यांनी या प्रक्रियेला प्राधान्य द्यावे. कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत सूचनांनुसारच ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


यासोबतच महसूल, समाजकल्याण आणि ग्रामविकास विभागातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, आशा व अंगणवाडी सेविकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचवून ३० जुलैपूर्वी ई-केवायसी पूर्ण होण्यासाठी सक्रिय सहकार्य करावे, अशा सूचनाही आमदार काळे यांनी दिल्या.


राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ कोणत्याही पात्र नागरिकापर्यंत अखंडितपणे पोहोचणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र लाभार्थ्यांनीही वेळेत ई-केवायसी पूर्ण करून स्वतःचा लाभ सुरक्षित ठेवणे तितकेच आवश्यक असल्याचे आ. काळे यांनी नमूद केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles